कल्याण /प्रतिनिधी – डोंबिवली पश्चिमेतील काही भागात तीव्र पाणीटंचाईची समस्या भेडसावत असल्याने या गंभीर प्रश्न स्थायी समितीच्या सभेत स्थायी समिती सदस्य व स्थानिक नगरसेवकांनी प्रशासनाच्या सावळागोधळाचा पाढा वाचीत नागरिकाच्या भावना मांडल्या होत्या या गंभीर प्रश्नी पालिका आयुक्त अभिनव गोयल आणि महापौर हर्षाली चौधरी यांनी तातडीची बैठक घेतली. पाणीटंचाई तातडीने सोडवा. त्यासाठी अभियंत्यांनी स्वतः जाऊन पाहणी करावी असे आदेश आयुक्त गोयल यांनी पाणी खात्याचे अभियंताना दिले आहेत.
डोंबिवली पश्चिमेकडील पाणी टंचाई प्रश्नावर भाजप नगरसेवक नंदू म्हात्रे, शिंदेसेनेचे नगरसेवक विकास म्हात्रे यांनी ७ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आवाज उठविला होता. या वृत्ताची दखल घेत आयुक्त गोयल, महापौर चौधरी यांनी मंगळवारी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीस नंदू म्हात्रे, विकास म्हात्रे, शिंदेसेनेचे गटनेते विश्वनाथ राणे यांच्यासह स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी उपस्थित होते. नागरिकांना कमी दाबाने पाणी का मिळते? पुरेसा पाणीपुरवठा का केला जात नाही? याची विचारणा आयुक्त गोयल यांनी अधिकाऱ्यांकडे केली. आयुक्तांनी अभियंता मळेकर यांना डोंबिवली पश्चिमेतील टंचाईग्रस्त भागात जाऊन पाहणी करा. त्या ठिकाणी पाणी कमी दाबाने का येते याचा तातडीने शोध घ्या. त्यावर उपाययोजना करा, असे आदेश आयुक्तांनी मळेकर यांना दिले आहेत.
डोंबिवली पश्चिमेतील विविध पक्षाचे नगरसेवक नागरिकांचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र नागरिकांच्या पाणी समस्येच्या मुद्द्यावर मंगळवारी पार पडलेल्या बैठकीस भाजपचे नंदू म्हात्रे, शिंदेसेनेचे विकास म्हात्रे आणि शिंदेसेनेचे गटनेते विश्वनाथ राणे हे तीनच सदस्य उपस्थित होते.
१४ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. त्याआधीच उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करा. उत्सव काळात नागरिकांच्या घरची घागर रिकामी नको, अशी सूचना भाजप नगरसेवक नंदू म्हात्रे यांनी केली आहे.

