कल्याण/प्रतिनिधी – उर्दू भाषा क्षेत्रातील योगदानाची दखल घेत दिल्लीतील गालिब इन्स्टिट्यूट संस्थेने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात एजाज अहमद शेख यांना प्रतिष्ठेच्या नॅशनल लँग्वेज अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
देशभरात उर्दू भाषेचा प्रचार व प्रसार करून उर्दू भाषेला दर्जा मिळवून देण्याचे कार्य अविरत पने करणाऱ्या शिक्षक व शिक्षण क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून केवळ ३ व्यक्तींची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली असून, त्यामध्ये एजाज अहमद शेख यांचा समावेश आहे.
दिल्लीतील गालिब इन्स्टिट्यूटमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आला.एजाज शेख हे कल्याण मध्ये वास्तव्यास असून ते मुंबई साकी नाका येथील ग्लोबल ज्युनिअर कॉलेज मध्ये उर्दू आणि भूगोल विषयाचे शिक्षक आहेत .गेल्या १५ वर्षापासून ते या कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. हे काम करत असताना इन्कलाब उर्दू वृत्तपत्रामध्ये पत्रकार म्हणून देखील कार्यरत आहेत . पत्रकार एजाज शेख यांना राष्ट्रीय भाषा पुरस्कार मिळाल्याने कल्याणातील पत्रकाराच्या वतीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

