मुख्य बातम्या व्हिडिओ

बाप्पांचा परतीचा प्रवास यंदा देखील रेल्वे रुळांवरूनच

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – गणेश चतुर्थी पासून मनोभावे पूजा अर्चा करून आज पाच दिवसांच्या बाप्पासह गौरी गणपतीला देखील  निरोप देण्यात आला. कल्याण डोंबिवली शहरातील मधोमध असलेल्या ९० फिट रोड कचोरे खंबाल पाडा परिसरातील भाविकांच्या  बाप्पांना यंदा  देखील रेल्वे रूळ ओलांडून आपले स्थान गाठावे लागले.

 कल्याण आणि ठाकुर्लीच्या दरम्यान असलेल्या कचोरे येथील विसर्जन घाटावर जाण्यासाठी रस्ता नाही, या भागात तलाव नसल्यामुळे बाप्पाच्या विसर्जनासाठी नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून गणेश घाटावर  जावे लागते. या भागातील ग्रामदेवतेचे मंदिर देखील खाडी किनाऱ्या लगत रुळापलीकडे आहे. विसर्जनादिवशी या ठिकाणी स्थानिक सागरदेवी सेवक मंडळ आणि पोलिसांच्या मदतीने गणेश भक्तांनी व्यवस्थितरित्या विसर्जन पार पाडले. असे जरी असले तरी खुद्द गणपती बाप्पाला देखील आपला परतीचा प्रवास करताना रेल्वे रूळ ओलांडावे लागले असल्याची मजेशीर चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती.

दरम्यान रेल्वे रुळांवरील हा जीवघेणा प्रवास टाळण्यासाठी या परिसरात कृत्रिम तलाव बनविण्याची तसेच याठिकाणी जाण्यासाठी बोगदा बनविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक नगरसेविका रेखा राजन चौधरी या गेल्या पाच वर्षापासून पालिका प्रशासनाकडे कृत्रिम तलाव बांधण्यासाठी तसेच रेल्वे प्रशासनाकडे बोगदा बनविण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. ५ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर यंदा पालिकेने विसर्जनासाठी पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली आहे. मात्र हि व्यवस्था अपुरी असल्याने भाविक खाडी किनारीच गणपती विसर्जन करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »