राजकीय व्हिडिओ

महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही – सी.टी. रवी

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – राज्यातील भाजप नेते राज्यात सत्तांतर होणार असल्याचं वारंवार सांगत असतात. आता भाजपच्या केंद्रीय नेत्यानेच राज्यात सत्तांतर होण्याचं सूचक विधान केलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार अधिक काळ टिकणार नाही, असं विधान भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

भाजपच्या पक्ष संघटनात्मक बैठकीसाठी सी. टी. रवी कल्याणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा डीएनए वेगळा आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत एकत्र लढली. त्यामध्ये लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या बाजूने कौल दिला. मात्र तरीही शिवसेनेने भाजपला धोका देत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या साथीने महाविकास आघाडी सरकार बनवत मतदारांना धोका दिला आहे. हे सरकार किती दिवस टिकते हे आम्ही पण पाहत असून जास्त दिवस टिकेल असे वाटत नसल्याचे रवी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान मन की बात’ हा संवादात्मक कार्यक्रम पाहण्यासाठी आज भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री व राज्याचे प्रभारी सी टी रवी कल्याणमध्ये बूथ प्रमुख सुनीता दत्तात्रय गरुड यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपा संघटनमंत्री श्रीकांत भारतीय, प्रदेश सचिव संदीप लेले, आमदार गणपत गायकवाड व कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे व जिल्ह्यातील सर्व मंडळ अध्यक्ष, सरचिटणीस, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »